भविष्यातील परिस्थिती कशी असेल, उदभवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय तयारी करावी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती यावेळी करुन देण्यात आली
ठाणे : करोना महामारीचा अंमल कमी होत असतानाच अनेक उद्योग बंद पडल्याने युवकांना नोकऱ्या कमी असल्याची चर्चा होत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून आपले ध्येय गाठण्यासाठी त्यांनी एकाच गोष्टीचा आग्रह न धरता समोर येणाऱ्या संधीचा फायदा उचलावा असे आवाहन एल के कंसल्टंटचे संचालक गौरव काजळे यांनी स्वराज संस्था आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात केले.
करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांत अनेक उद्योग डबघाईस आल्याने अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती कशी असेल, उदभवणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय तयारी करावी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती करुन देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गौरव काजळे म्हणाले, वाणिज्य, कला, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाशिवाय वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार झाले आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी युवकांनी नवनवीन गोष्टी शिकव्यात, कामात झोकून देताना त्यात जास्तीत जास्त अचूकता कशी आणता येईल यासाठी प्रयत्नशील असावे. याशिवाय माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, जाहिरात, केपीओ, परदेशी चलन व्यवहार, लघु आणि मध्यम उद्योग आस्थापना आदी विविध क्षेत्रांत उपलब्ध असणाऱ्या नोकरींच्या संधी यांची माहिती काजळे यांनी विद्यार्थी, युवकांना दिली.
24,170 total views, 2 views today