कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एकात्म मानवदर्शन यांची सांगड उत्तर शोधण्यासाठी उपयुक्त

  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय आजच्या संदर्भात” याविषयावर बोलताना डॉ. हर्षल भडकमकर यांनी व्यक्त केले मत

ठाणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदयाचा विचार मांडत असताना संगणकावर काम सुरू झाले होते. एकात्म मानवदर्शनची मांडणी करत असताना संगणक शक्ती विरुध्द श्रमशक्ती अशी चर्चा सुरू झाली होती. शरीर, आत्मा, मन, बुद्धी असे सूत्र सांगितले जात असताना यंत्रयुगाच्या परिणामाची चर्चा होत होती. साठ-सत्तरच्या दशकातील दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेले तत्वज्ञान आणि आजचा वेगाने बदलणारा काळ लक्षात घेऊन दीनदयाळ उपाध्याय विचार आणि कार्य उलगडून सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. हर्षल भडकमकर यांनी दीनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय आजच्या संदर्भात या विषयावर बोलताना केले.  दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त सदर व्याख्यानाचे आयोजन प्रताप व्यायाम शाळा येथे केले होते. यावेळी व्यासपीठावर दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा.दाते, कार्यवाह मकरंद मुळे उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. हर्षल भडकमकर पुढे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाने सर्व संदर्भ बदलत आहेत. बदलांचा वेग वाढता आहे. समाज माध्यमातून धारणा बदलत आहे. वस्तुनिष्ठ आणि आभासी व्यक्ती, समष्टी असे द्वंद्व सुरू आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता विचारांची दिशा बदलण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याची सांगड घालून आजच्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत असे प्रतिपादन डॉ. हर्षल भडकमकर यांनी केले. दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा. दाते यांनी आपल्या भाषणात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची माहिती दिली. व्याख्यानाचे प्रास्ताविक दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे यांनी केले. आपल्या प्रास्तविकात केंद्राच्या उपक्रमाची माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रदीप भावे यांनी केले. व्याख्यानाला दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कोषाध्यक्ष भरत अनिखिंडी, सदस्य प्रमोद घोलप,  उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माधव नानिवडेकर, भारतीय शिक्षणचे दिलिप केळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 13,284 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.