जिल्ह्यात लम्पिने बाधित जनावरांची संख्या ४३ वर – पशु पालकानी घाबरून जावू नका ; लसीचा साठा मुबलक प्रमाणात

ठाणे, ता. १६ :
दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात लम्पी आजाराने बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात लम्पी आजाराच्या बाधित जनावरांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. बाधित जनावराच्या ठिकाणापासून पाच किमी पर्यंतच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेला लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून जनावरांना ही लस मोफत देण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकरी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा पशु संवर्धन विभागाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती दिली. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सर्वत्र एकाच खळबळ उडाली. त्यातच या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या थेट ४३ वर जावून पोहोचली आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील १२ गायीवर्ग, भिवंडीत चार, कल्याण दोन, पशु सर्व चिकित्सालय शेलार येथे १० जनावरांमध्ये, तालुका लघु चिकित्सालय शहापूर येथील चार आणि बदलापूर तालुका लघु चिकित्सालय येथील ११ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यानंतर जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून या जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार लागण झालेल्या प्राण्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या अंतरातील प्राण्यांचे लसीकरण करण्याचे काम सुरु केले. यासाठी ठाणे जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण करण्यासाठी ३८ हजार लसीचा साठा उपलब्ध आहे. तसेच जनावरांना ही लस मोफत देण्यात येत आहे. तसेच ज्या पशु पालकाला जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पशु रुग्णालयात नेवून तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. रुपाली सातपुते यांनी केले. तसेच इतर वेळी जनावरांच्या तपासणीसाठी शासकीय पशु रुग्णालयांमध्ये दहा रुपये आकारणी करण्यात येत असते. मात्र, या आजाराची पार्श्वभूमीवर अशी कोणतीही आकारणी करण्यात येत नसून मोफत उपचार करण्यात येत असल्याची माहिती देखील डॉ. सातपुते यांनी दिली. तसेच जर कोणी तपासणी दराची आकारणी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे इशारा देखील यावेळी डॉ. सातपुते यांनी दिला.दरम्यान, बदलापूर, शहापूर, भिवंडीतील शेलार, भिवंडी पालिका हद्दीतील बाधित क्षेत्रातील १० हजार ५७७ जनावरांपैकी ८ हजार ४५० जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.

  • लम्पिचा धोका कमी
    म्हशीं मध्ये लम्पी हा आजार आढळून येत नाही. याचा प्रादुर्भाव हा गायी वर्गाच्या जनावरांमध्ये अधिक आढळून येत आहे. त्यात जिल्ह्यात गायीवर्गाचे प्रमाण ७५ हजार इतके असून असून म्हैस वर्गाचे प्रमाण ९५ हजार इतके आहे. त्यामुळे गायी वर्गाचे प्रमाण आणि म्हैस वर्गाचे प्रमाण यांची तुलना केल्यास गायी वर्गाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या आजाराचा धोका तुलनेनं कमी असल्याचे मत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.

 826 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.