धो धो पावसात महापौर उतरले रस्त्यावर

ठाणे – एकीकडे धो धो पावसाचा जोर वाढत असतानाच आज महापौर नरेश म्हस्के भर पावसात प्रत्यक्ष जागेवर जावून शहरातील ज्या ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणांचा आढावा घेतला. पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पंपीगची सोय करणेबाबत सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे आज झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ही बाब निदर्शनास येताच महापौरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेधर धरले व संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर महापालिका कार्यक्षेत्रात संभाव्य आपत्कालीन परिस्थ‍िती उद्भवणाऱ्या ठिकाणांची पाहणी आज महापौर नरेश म्हस्के यांनी भर पावसात केली. यावेळी ठाणे शहरातील चिखलवाडी, भांजेवाडी, राम मारुती रोड, गडकरी रंगायतन परिसर, आंबेडकर रोड, सिडको परिसर (रेल्वे पुलाखाली) विटावा रेल्वे ब्रिजखालील जागा या ठिकाणची पाहणी केली. उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक संजय वाघुले, सुधीर कोकाटे,  नगरसेविका नम्रता कोळी, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, पुजा करसुळे, उपायुक्त संदीप माळवी,सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, सचिन बोरसे, आपत्कालीन विभागाचे व्यवस्थापक संतोष कदम, कार्यशाळा विभागाचे कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते.

आज पहाटेपासून हवामानखात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाला ठाणे शहरात सुरूवात झाली. विविध ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात, अशा ठिकाणची पाहणी महापौर यांनी केली. काही ठिकाणी निश्च‍ितच आपत्कालीन परिस्थ‍िती आहे, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करुन कोणत्याही प्रकारची भीषण दुर्घटना घडणार नाही या दृष्टीने प्रशासनाने सतर्क रहावे, तसेच विभागवार स्थानिक नगरसेवक व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत आपत्कालीन ठिकाणांची पाहणी केली व तसेच आपत्कालीन परिस्थ‍िती उद्भवणाऱ्या ठिकाणी मनुष्यबळ व पंपाची सोय केली नसल्याची बाब निदर्शनास येताच महापौरांनी याचा जाब विचारत सर्व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले व नागरिकांना विनाकारण त्रास झाल्यास याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असेही स्पष्ट केले. मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी मी स्वत: केली व आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी देखील कामांचा आढावा घेतला आहे, सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी सुध्दा नालेसफाईचा आढावा घेत आहेत. परंतु पुढील चार दिवस हे अतिवृष्टी होणार असल्याने प्रशासनाने सज्ज रहावे व कोणत्याही पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा होईल या दृष्टीने सर्व उपाययोजना करुन आपत्कालीन परिस्थ‍ितीत  सतर्क  राहण्याच्या सूचना  महापौरांनी प्रशासनाला दिल्या.

यावेळी चिखलवाडी परिसरातील नागरिकांनी देखील महापौरांशी चर्चा करुन समस्या मांडल्या. तसेच यावेळी आंबेडकर रोड व विटावा ब्रिजखाली साचणाऱ्या  पाण्याचा पंपीगच्या सहाय्याने उपसा करावा व या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थ‍िती निर्माण होणार नाही याबाबत सतर्क राहण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच ज्या विभागात पूरसदृश्य परिस्थ‍िती निर्माण झाल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी किंवा संबंधित प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधावा व महापालिकेने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.

 327 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.