लसीसाठी पैसे कोठून येणार, विचारले म्हणून गुन्हा केला का?

भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांचा सवाल, मंत्रीपत्नी व विरोधी पक्षनेत्याचे आंदोलन म्हणजे राजकारण नव्हे का?

ठाणे –  महापालिका खरेदी करणार असलेल्या पाच लाख लसीसाठी पैसे कोठून येणार, अशी विचारणा केल्यावर गुन्हा केला का, असा सवाल भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची पत्नी महापालिकेबाहेर पायऱ्यांवर आंदोलन करते, तर सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते झाडांच्या फांद्या घेऊन महापालिकेत येतात, हे राजकारण नसावे, तर ते शिवसेनेच्या दृष्टीने समाजकारण असेल, असा टोलाही डुंबरे यांनी लगावला आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे लस खरेदीसाठी आवश्यक आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याची कबुली महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांतच महापालिकेकडून पाच लाख लसखरेदीची तयारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने लस खरेदीसाठी पैसे कोठून येणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात भाजपाचा लसखरेदीला कोठेही विरोध नसल्याचे म्हटले नव्हते. मात्र, महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपाचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर भाजपा राजकारण करीत असल्याचाही आरोप केला. आम्ही लस खरेदीसाठी पैसे कोठून येणार, हा प्रश्न विचारला म्हणजे गुन्हा केला का, असा सवाल गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या पायऱ्यांवर राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या पत्नीने आंदोलन केले होते. तर महापालिकेच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच विरोधी पक्षनेते झाडांच्या फांद्या घेऊन सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला राजकारण म्हणायचे नाही, तर समाजकारण म्हणायचे का? मंत्री पत्नी व विरोधी पक्षनेत्यांना रोखण्याची महापौर नरेश म्हस्के यांनी हिंमत का केली नाही, असा सवालही डुंबरे यांनी केला. शिवसेनेला अडचणीचे वाटणारे प्रश्न विचारल्यावर भाजपा राजकारण करतेयं, अशी बोंब मारण्यात महापौर नरेश म्हस्के आघाडीवर असतात, असेही डुंबरे यांनी नमूद केले.
महासभेत भाजपाच्या सदस्यांचे आवाज म्यूट करण्याचे सर्रास प्रकार होतात. वेबिनार महासभेच्या माध्यमातून भाजपाला जनहिताचे प्रश्नही मांडू दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामार्फत प्रेसनोट प्रसिद्ध करून आवाज उठविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, तो शिवसेनेला झोंबत आहे. कोविड आपत्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. विचारपूस करणाऱ्या एका फोनसाठी १५ रुपये शुल्क देणे हा त्यातील प्रकार होता. त्याबाबत शिवसेना व महापौर नरेश म्हस्के मूग गिळून का गप्प आहेत, असा सवालही डुंबरे यांनी केला.

कूपन पळवापळवी सुरूच
लसीकरणातील व्हीआयपी कल्चर व कूपन सिस्टीम बंद करण्याची केवळ घोषणाच झाली. शिवसेनेचाच एक पदाधिकारी बिनधास्तपणे कूपन घेत होता. त्यावर शिवसेनेचे बडे नेते गप्प आहेत. त्यामुळेच सामान्य ठाणेकरांना रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे. रांगेतील ज्येष्ठ नागरिकांना बिस्किट व पाणी दिलं, तर शिवसेनेच्या नेत्यांच्या पोटशूळ का उठत आहे, असा सवालही गटनेते डुंबरे यांनी केला.

महापौर महोदय, कम्युनिटी किचनचे धान्य पळविणाऱ्यांच्या चौकशीचे काय झालं?
कोरोना आपत्तीच्या काळात राज्य सरकारने कम्युनिटी किचनसाठी महापालिकेला पुरविलेला किराणा व धान्य काही बड्या पुढाऱ्यांनी परस्पर स्वत:च्या ब्रॅण्डिंगसाठी वापरला होता. या प्रकरणाच्या चौकशीची महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. `राणा भीमदेवी’ थाटात चौकशीची मागणी करणाऱ्या नरेश म्हस्केंनी या चौकशीचे काय झाले, ते प्रशासनाला विचारून माहिती जाहीर करावी. ते धान्य व किराणा कोणत्या नेत्याने स्वत:च्या मतदारांना वाटले, ते ठाणेकरांना सांगावे. मात्र, अशी हिंमत नरेश म्हस्के यांच्यात कदापि येणार नाही, हे निश्चित,असा टोलाही भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला. मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटसह वैद्यकीय साहित्याची चढ्या भावाने खरेदी करण्यात आली. मात्र, त्यावरही सत्ताधारी शिवसेनेनेच पांघरूण घातले, असा आरोप डुंबरे यांनी केला.

 648 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.