राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात दोन तृतीयपंथीयांसह २७१ जणांनी केले रक्तदान

अवघ्या चार तासातच ठाणेकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने हा नवा विक्रम ठरणार आहे.

ठाणे :  एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या  रक्तदान शिबिरात दोन तृतीयपंथीयांसह २७१ जणांनी रक्तदान केले. अवघ्या चार तासातच ठाणेकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने हा नवा विक्रम ठरणार आहे. 
कोरोना  काळात महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा आणि पुरवठा कमी झाला आहे.  महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अपील केले आहे की,  की लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे. रक्ताचा साठा हा केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच शिल्लक  आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड  यांनी स्वतः रक्तदान करून एक चांगले उदाहरण प्रस्तुत केले.  त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे शहराच्या वतीने रविवारी ,  एनकेटी हाॅल, खारकर अळी येथे सकाळी अकरा ते तीन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन रक्तदान करणाऱ्या ठाणेकरांचे तसेच रक्त संकलन करणाऱ्या ब्लडलाईन रक्तपेढीच्या पथकाचे कौतूक केले. 
शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, या रक्तदान शिबिरात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून महाराष्ट्रावरील रक्तटंचाईचे  संकट दूर करावे, असे आवाहन केले होते. या अवाहनाला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. अवघ्या चार तासात २७१ युनिट रक्त संकलन करण्यात आले.     विशेष म्हणजे, सामाजिक भान जीवंत असणारे रेश्मा  कांबळे आणि अमृता सिंह या दोन तृतीयपंथीयांनीही या शिबिरात रक्तदान केले. समाजाची अवहेलना स्वीकारणाऱ्या या तृतीयपंथीय समाजघटकाने  रक्तदानात सहभागी झाल्याने या दोन्ही तृतीयपंथीयांचे  विशेष कौतुक केले जात आहे.
यावेळी  माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील,  प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, ज्येष्ठ नगरसेविका अपर्णा साळवी,  सामाजिक कार्यकर्त्या ॠताताई आव्हाड,  महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील,  परिवहन सदस्य नितीन पाटील, प्रकाश पाटील, विद्यार्थी सेलचे  ठाणे शहराध्यक्ष  प्रफुल्ल कांबळे, युवती ठाणे शहर अध्यक्षा पल्लवी जगताप, सामाजिक न्याय विभागाचे  शहराध्यक्ष कैलास हावळे, असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले, फेरीवाला सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे, अॅडव्होकेट सेलचे अध्यक्ष अॅड. विनोद उतेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय,  ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस प्रभाकर सावंत,  रवींद्र  पालव,  मधुर राव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सलीम पटेल, विजय भामरे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य , सर्व ब्लाॅक अध्यक्ष,  सर्व प्रभाग अध्यक्ष,  महिला आणि युवक पदाधिकारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

 731 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.