म्हणून फडणवीसांनी मांडला गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात विशेषाधिकार हक्कभंग

अन्वय नाईकप्रकरणी गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती

मुंबई : आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वक्तव्य करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केस दाबून ठेवल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही त्याबाबतची माहिती सभागृहास चुकीच्या पध्दतीने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपण विशेषाधिकार हक्कभंग मांडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावर मी व्यक्तीशः स्वतः बोलत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुम्ही अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबून ठेवल्याचे सांगितले. तसेच अर्णव गोस्वामीला वाचविण्यासाठी तुम्ही या गोष्टी केल्याचा आरोप केला. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय झालेला असून त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी अन्वय नाईक यांनी व्यवसायातील कारणामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट आहे. तसेच त्यांना थकित रक्कम मिळाली नसल्याने नाईक यांनी आत्महत्या केल्याचेही सांगितल्याने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात निकाल झाला आहे. परंतु गृहमंत्री देशमुख यांना हि सर्व माहिती अवगत अर्थात माहित असतानाही त्यांनी सभागृहात ते वक्तव्य करून सभागृहाची दिशाभूल केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांच्या विरोधात विशेषाधिकार हक्कभंग आपण दाखल करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
त्यावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सदरचा फडणवीस यांचा प्रस्ताव तपासून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.

 417 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.