जानेवारी महिन्यात कर भरा आणि दंड, व्याजावर १०० टक्के सवलत मिळवा

कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मालमत्ता व पाणी कर वसुलीसाठी विशेष योजना : महापौर नरेश म्हस्के

ठाणे : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सदरची बाब लक्षात घेवून ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या दंड, व्याज,शास्ती (वाणिज्य वगळून) आदी बाबींमध्ये १ ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये १०० टक्के सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले असून त्यास महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी मान्यता देऊन त्याची अमंलबजावणी केली आहे. या अभय योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपला कर भरणा करावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सन २०१४-१५ या कालावधीमध्ये उत्पन्नाच्या विविध बाबींमध्ये गतिमानता येण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, याच धर्तीवर कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक, व्यवसाय आर्थिक विवंचनेत आहेत, त्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्वसाधारण सभेत ही अभय योजना पुन्हा राबविण्याची सुचना महापौर नरेश म्हस्के यांनी केली त्यास राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अनुमोदन दिले व या सूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील पाठिंबा दर्शविला. याबाबींचा सर्वंकष विचार करुन ठाणेकरांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी असे आदेश सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.
या योजनेतंर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपटटी (वाणिज्य वगळून) व मालमत्ता करात १ ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये नागरिकांना पाणीपट्टी व मालमत्ता करामध्ये दंड, व्याज, (शास्ती) आदीमध्ये १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे नागरिक, करदाते पाणीपट्टी व थकीत मालमत्ता कराच्या रकमेसह चालू आर्थिक वर्षाचा कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी भरतील त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. ज्या करदात्यांनी यापूर्वी दंड, व्याजासह कराची रक्कम जमा केली असल्यास, सदरची योजना लागू होणार नाही. यापर्वी ठाणेकरांनी महापालिकेला वेळेवेळी सहकार्य केले आहे याचा विचार करुन नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी निर्णय घेतला आहे असे महापौर यांनी नमूद केले आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

 477 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.