महिला स्वच्छतागृहांच्या नावे १० कोटींची ‘हातसफाई’

भाजप महिला मोर्चाने आंदोलन करुन फोडली वाचा, ठाणेकरांच्या पैशांची पालिकेकडून उधळपट्टी, शहरांतील अर्बन रेस्ट रूम दोन वर्षे पडली आहे धुळखात

ठाणे : सार्वजनिक ठिकाणी वावरतांना महिलांची कुंचबणा  होऊ नये या उद्देशाने शहराच्या विविध भागात सुमारे १०कोटी रुपये खर्च पालिकेने अर्बन रेस्ट रूम उभारली. मात्र, या रेस्ट रुमची देखभाल आणि सुरक्षा करण्यासाठी कंत्राटदार नेमण्याची तसदीच पालिकेने घेतलेली नाही. त्यामुळे २८ पैकी फक्च सात रेस्ट रूमचा वापर महिलांना करता येतोय. उर्वरित ठिकाणांना टाळे लागले असून स्वच्छतागृहांचे अक्षरशः उकिरडे झालेले दिसतात. ठाणेकर करदात्यांच्या पैशांची प्रशासन आणि सत्ताधा-यांच्या संगनताने सुरू असलेल्या या उधळपट्टीचा निषेध करण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा तथा नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी आंदोलन करण्यात आले. या रेस्ट रूम तात्काळ सुरू झाल्या नाही तर या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पेंडसे यांनी दिला.
महिलांसाठी उभारण्यात आलेल्या वॉश कम रेस्ट रूमध्ये बायो डायजेस्टिव्ह पद्धतीने प्रसाधनगृह, चेंजिंग कम फीडिंग रूम, सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन, सॅनेटरी नॅपकीन इन्सेनरेटर आणि एटीएम सेंटर अशा सुविधा देण्याचे नियोजन होते. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे योजनेच्या मूळ उद्देशाचे मातेरे झाल्याचा आरोप पेंडसे यांनी केला आहे. ठाणे महापालिके आपल्या निधीतून बांधलेल्या १६ पैकी १४ रेस्ट रूम गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत. तर, स्मार्ट सिटी योजनेअंततर्गत बांधलेल्या १२ पैकी सात रेस्ट रूमला आजही टाळे लागले आहे. यो दोन्ही कामांवर सुमारे १० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, या सुविधेचा वापरच महिलांना करता येत नाही. हा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी गुरुवारी सकाळी मृणाल पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला मोर्चाने घोडबंदर भागातील मानपाडा येथील अर्बन रेस्टरुम जवळ आंदोलन केले. यावेळी स्वप्नाली साळवी, स्नेहा शिदे, माधुरी  मेटागे, तृप्ती पाटील, सुनिता पवार,जयश्री सोलकी,राधा शर्मा,अपर्णा झोडगे मत्स्यगंधा पवार, शिल्पा जित्ता, वीणा लाड, राधिका ताटे, मोनिका पहुजा, वर्षा सुर्वे, पूजा गन्द्रे,आणि अनेक महिला मोर्चा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी महापालिकेतील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, रेस्टरुम सुरु झालीच पाहिजे अशा घोषणाही महिलांनी दिल्या.
सत्तेच्या जोरावर मनमानी
या रेस्टरुममध्ये भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे, काही ठिकाणी गर्दुल्ले यांचा वापर करीत आहेत. आपल्या लहानग्यांना स्तनपान करता यावे, यासाठी असलेल्या जागांमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य दिसते. कुठे बसण्यासाठी केलेले बाकडे चोरीला गेले आहेत, तर कुठे जाळ्याच चोरल्या आहेत. येथील सीसीटीव्ही चोरीला गेले असून जे आहेत त्यावर मातीचे थर साचलेले दिसतात.  सत्तेच्या जोरावर खर्चीक प्रकल्प ठाणे महापालिकेत मंजूर केले जातात. त्यासाठी कोट्यावधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात घातले जातात. परंतु, प्रत्यक्षात   निधी कुठे जातो. योजनेचे उद्देश साध्य झाला आहे की नाही याचा गंधही पालिकेला नसतो असा आरोप पेंडसे यांना यावेळी केला.
दोषी अधिका-यांवर कठोर कारवाई करा
या योजनेबाबत चौकशी केली असता ही रेस्ट रूम साजनिक बांधकाम विभागाने बांधले आहेत. परंतु, त्याच्या नीगा देखभालीची जबाबदारी ही घनकचरा विभागाकडे असल्याचे उत्तर देण्यात आले. एकमेकांवर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न अधिका-यांकडून होत आहे. पालिकेच्या दोन वविभागात समन्वय नसल्याने त्याचा फटका समस्त ठाणेकरांना सहन करावा लागतोय. त्यामुळे या बेजबाबदार अधिका-यांवर आयुक्तांनी कठोर करावी करायला हवी.
मृणाल पेंडसे, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा

 455 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.