मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रतित्तुर
मुंबई : मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करायला जात नाही. उलट या कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारत आहेत. तेथील परिस्थिती जावून पाहण्यापेक्षा राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मग केंद्राने काय घोषित आणीबाणी सुरु केलीय का? असा खोचक प्रतित्तुर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपाला दिले.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आदी उपस्थित होते.
मागील वर्षभरात आघाडी सरकारने कोणतीही कामे केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या आधीच विरोधी हा शब्द आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम केले. परंतु त्यांच्याकडून आघाडी सरकार पाडण्यासाठी मुहूर्त शोधण्यात गेल्याने त्यांना सरकारने केलेली कामे कसे दिसतील असा सवाल करत आम्ही केलेल्या कामाची पुस्तिका नुकतीच प्रकाशित करून ती प्रसारमाध्यमातून जनतेपर्यत पोहोचविल्याचे स्पष्ट केले.
त्याचबरोबर विरोधकांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर महाविकास आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, फडणवीसांना काही सुचवाचय ते त्यांनी थेट सुचवावे. हल्ली त्यांच्या पक्षात कोण असावं कोण नसावं याचा निर्णय तेच घेत आहेत. तसेच डोईजड होणाऱ्यांना तसे ही ते बाहेर घालविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांनी थेट सुचवावे असा उपरोधिक टोलाही लगावला.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही. त्यामुळे कोणीही त्यांच्यामध्ये भ्रम निर्माण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची पत्रकार परिषद म्हणजे उत्साह नसलेली होती असे सांगत त्यांच्या बोलण्यात जोश असा नव्हता. त्याचे चेहरे पडलेले होते. कदाचित त्यांना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत होते असा टोलाही त्यांनी लगावला.
402 total views, 2 views today