लॉकडाऊन नंतर धावली वाशी मार्गावर बस, नोकरदार वर्गाला होणार फायदा
कल्याण : लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या श्रीराम टॉकीज ते वाशी बससेवेचा पुनश्च हरीओम करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या या बसला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते भगवा झेंडा दाखवून हि बस वाशीला रवाना करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन सेवा देखील बंद करण्यात आली होती. आता मिशन बिगेन अगेन मध्ये परिवहनचे बाहेरील अनेक मार्ग सुरु करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्व विठ्ठलवाडी नजीक असलेल्या श्रीराम टॉकीज चौक ते वाशी हि बससेवा देखील सुरु करण्यात आली आहे. याआधी कल्याण पूर्वेतील नागरिकांना नवीमुंबईला जाण्यासाठी कल्याण स्टेशनला येऊन जावे लागत होते. मात्र या बससेवेमुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांसह उल्हासनगर मधील नागरिकांना देखील वाशी नवीमुंबई याठिकाणी जाणे सोयीस्कर होणार आहे. वाशी नवीमुंबईला कल्याण मधून कामाला जाणारा कामगारवर्ग मोठा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना रेल्वेने जाण्यास मुभा असली तरी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपल्या कामाचे ठिकाण गाठण्यासाठी दुचाकी, चारचाकी, एस.टी. बस आदींचा आधार घ्यावा लागत आहे. केडीएमटी बस यामार्गावर सुरु झाल्याने कामगार वर्गाला दिलासा मिळणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
ही बस सकाळी ८:१५ वाजता श्रीराम टॉकीज पासून वाशीकडे रवाना होईल तर सायंकाळी ५.४५ वाजता वाशीहून श्रीराम टॉकीज कडे परतीच्या प्रवासासाठी सुटणार असल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले. श्रीराम टॉकीज समोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास परिवहन समिती सभापती मनोज चौधरी, नगरसेवक धनंजय बोडारे, नगरसेवक महेश गायकवाड, राजाराम पावशे, पुरुषोत्तम चव्हाण, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, महादेव रामभोळे, शरद पावशे आदी मान्यवर उपस्थित होते.
488 total views, 1 views today