रविवारपासून शरद पवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वात नुकसान झालेल्या उस्मानाबाद, औसा, तुळजापूर,परांडा येथील गावांना भेटी देणार

मुंबई : गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून दोन दिवसाच्या दौर्‍यावर आहेत.
दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी खासदार शरद पवार हे बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत. रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा तुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्रात आलेल्या कोणत्याही संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदा धावून जातात. विशेषतः शेतकर्‍यांच्या अडीअडचणीला तर सर्वात आधी जात असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे आताही शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे समजताच शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर पोचत आहेत.

 352 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.