भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज

कोव्हिड-१९ च्या काळात ४ भारतीय स्टार्टअप युनिकॉर्नच्या स्वरुपात पुढे आले

मुंबई : लॉकडाऊन पश्चात भारतीय स्टार्टअप्स पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होत असल्याचे ‘कोव्हिड-१९ अँड द अँटीफ्रॅजिटी ऑफ इंडियन स्टार्टअप इकोसिस्टिम’ या अहवालातून निदर्शनास आले आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी एनजीओ टायच्या (TiE) जागतिक नेटवर्कमधील सर्वात सक्रिय भाग टाय दिल्ली-एनसीआरने झिनोव्हसोबत भागीदारी करत हा अहवाल जारी केला आहे.
कोव्हिड-१९ मुळे स्टार्टअप इकोसिस्टिममला विविध बाजूंनी नुकसान पोहोचवले. मार्चपासून जून २०२० पर्यंत झालेल्या लॉकडाऊनमुळे यावर विशेष परिणाम झाला. दरम्यान अर्थव्यवस्था सुरु झाली असून मागणी तसेच गुंतवणुकदारांमधील उत्साह या दोहोंमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने सुधारणा दिसून येत आहे. ७५ टक्के स्टार्टअपची स्थिती लॉकडाऊननंतर हळू हळू, मात्र निरंतर स्वरुपात पूर्वपदावर येत आहे. सुमारे ३० टक्के स्टार्टअपनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यासाठी बाजाराकडे धाव घेतली आहे. तर ५५ टक्के स्टार्टअप खर्च कमी करून अधिक नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
टाय दिल्ली-एनसीआरचे अध्यक्ष रंजन आनंदन म्हणाले, “भारतीय इकोसिस्टिमवरील लॉकडॉउनचा तात्कालिक परिणाम खूप गंभीर होता, त्यामुळे एवढ्या वेगाने भारतीय संस्थापकांनी नव्या पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये बदल केलेला पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. यापेक्षा जास्त प्रभावी बाब म्हणजे, स्टार्टअपने आपला खर्च कमी करत आर्थिक स्थिती वेगाने मजबूत केली. डिजिटल आधारीत क्षेत्रात इतरांच्या तुलनेत प्रचंड वेगाने सुधारणा पहायला मिळाली असून कोव्हिड-१९ पूर्वीपेक्षाही जास्त अग्रेसर आहेत. गुंतवणुकीत वेगाने सुधारणा दिसून आला आणि आम्हाला आशा आ हे की, भारतीय युनिकॉर्नमध्ये २०२० आणि २०२१ मध्ये निरंतर वृद्धी पहायला मिळेल. कोव्हिड-१९ हा इकोसिस्टिमला बसलेला मोठा हादरा असा तरी या साथीमुळे झालेल्या बदलांनी इकोसिस्टिम अनेक बाजूंनी बळकट होण्यास मदत मिळेल. भारत २०२५ पर्यंत १०० युनिकॉर्न मिळवण्याच्या मार्गावर आहे.”
या अहवालात फंडिंग, एमअँडए, सेक्टरवर प्रभाव, उद्योजक व गुंतवणूकदारांचे विचार तसेच बाजाराची बदलती स्थिती यासारख्या विविध पैलूंचा अभ्यास करून भारतीय स्टार्टअपच्या इकोसिस्टिमवर कोव्हिड-१९चा प्रभाव समजवून सांगण्यात आला आहे. तसेच कोव्हिड-१९ चे परिणाम कमी करण्यासाठी बिझनेस मॉडेलला नवे रुप देण्यासाठी उद्योजकांनी काय पावले उचलली, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. इकोसिस्टिममध्ये सुधारणेसाठी सांगण्यात आलेल्या कारकांमध्ये एमअँडए प्रक्रियांत वाढ आणि अखेरीस सीड फंडिंगमध्ये वृद्धी यांचा समावेश आहे.
परिस्थिती झपाट्याने सुधारत असून सप्टेंबर २०२० च्या तिमाहीच्या अखेरीस एकूण गुंतवणुक आणि स्टार्टअपमधील खासगी गुंतवणूक या दोन्हींचे प्रमाण कोव्हिड-१९ पूर्वीच्या स्थितीत पोहोचले आहे. विशेष म्हणजे चार भारतीय स्टार्टअप कोव्हिड-१९ च्या काळात युनिकॉर्नच्या स्वरुपात पुढे आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताकडे २०२० च्या अखेरीस ८ युनिकॉर्न असण्याची शक्यता आहे. ही संख्या २०१९ च्या तुलनेत सारखीच आहे. तसेच २०२० च्या अखेरपर्यंत भारतीय स्टार्टअप इकोसिस्टिममधून ७-७.५ लाख प्रत्यक्ष आणि २६ ते २८ लाख अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे, यामुळे सुधारणेची स्थिती आणखी मजबूत होईल. महामारीमुळे निर्माण झालेल्या असंख्य समस्यांच्या काळात ग्राहकांच्या गरजेनुसार स्वत:त बदल घडवणे आणि परिस्थितीनुसार नव्या प्रयत्न करण्याची उद्योजकांची प्रतिक्रिया यामुळे इकोसिस्टिम बळकट असल्याचे दिसून आले असल्याचे अहवालातून निदर्शनास आले आहे.

 409 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.