दोन तासाच्या बत्तीगुलनंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

ठाणे : शहराला आणि उपनगरीय रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटाच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास दोन तास मुंबई शहराबरोबर उपनगरातील वीज पुरवठा ठप्प झाला. तसेच उपनगरीय रेल्वे वाहतूकही ठप्प झाल्याने मुंबई पूर्णपणे थांबल्याचे चित्र आज अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.
या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास आदेश देत उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले होते.
दरम्यान दोन तासानंतर अखेर वीजेचा पुरवठा सुरळीत झाला असून उपगनरीय गाड्याही धावण्यास सुरुवात झाली. हा वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक ठिकाणी उपनगरीय गाड्या आहे त्या ठिकाणी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे गाडीतल प्रवाशीही आहे त्या स्थितीत अडकून पडले.
यासंदर्भात विद्युत पुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये अचानक बिघाड झाल्याने मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती टाटाच्या विद्युत कंपनीकडून देण्यात आली.

 342 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.