वाघबीळ नाका येथे जनआंदोलन
ठाणे : ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. तर घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलांवरील खड्ड्यांमुळे नागरिकाचा बळी गेला असून, अनेक अपघात झाले आहेत, याकडे लक्ष वेधत भाजपाकडून वाघबीळ नाका येथे आज जनआंदोलन करण्यात आले. ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास भाजपाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी दिला.
घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ट्रकमधील खोके पडल्यामुळे मोटारीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर आणखी पाच अपघात झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोडवरील उड्डाणपुल व ठाणे शहरातील खड्ड्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाघबीळ नाका येथे जनआंदोलन करण्यात आले. आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपाचे घोडबंदर रोड मंडल प्रमुख हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. या वेळी खड्ड्यात वृक्षारोपणही करण्यात आले.
शिवसेना सलग २५ वर्षे सत्तेत असूनही ठाण्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर एमएमआरडीए, एमएसआरडीसी सारखे विभाग पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानाही ठाणे शहर खड्डेमुक्त होऊ शकले नाही, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली.
खड्ड्यांमुळे अपघातात नागरिकांचे मृत्यू होत आहेत. टाळूवरील लोणी खाणार्या सरकारला आजच्या जनआंदोलनानंतरही जाग न आल्यास, आगामी काळात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिला.
544 total views, 1 views today