कोरोना रुग्णांच्या समुपदेशनाबाबत पालिकेकडून होणारे दुर्लक्ष दुर्देवी


आमदार निरंजन डावखरे यांची खंत

ठाणे : कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात समुपदेशक (कौन्सलर) नेमण्याच्या मागणीकडे महापालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, रुग्णांच्या मानसिक स्थितीबाबत महापालिकेला गांभीर्य नसल्याची बाब दुर्देवी आहे. या प्रकारामुळेच ग्लोबल रुग्णालयात आत्महत्येची घटना घडली, असा आरोप भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
बाळकूम येथील कोरोना विशेष रुग्णालयात दादा पाटीलवाडी येथील वृद्ध रुग्ण भिकाजी वाघुले (वय ७२) यांनी तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. यापूर्वीही या रुग्णालयात दोघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी डॉ. किरीट सोमय्या, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन कोरोना रुग्णालयात कौन्सलर ठेवण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालिकेच्या वतीने रुग्णालयांमध्ये समुपदेशकांची (कौन्सलर) नियुक्ती करण्यात येईल. पीपीई किट घालून समुपदेशकांकडून प्रत्येक रुग्णाशी संवाद सादला जाईल, असे आश्वासन डॉ. शर्मा यांनी दिले होते. मात्र, ते अद्यापि पूर्ण झालेले नाही, अशी खंत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.
ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती बिघडत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. रुग्णालयातील वातावरण, डॉक्टरांचा वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा पीपीई किट घालून असलेला वावर, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर समाजाकडून मिळणारी वागणूक आदींबरोबरच मृत्यूच्या भयामुळे रुग्णांची मानसिक स्थिती बिघडते. त्यामुळे या रुग्णांचे वेळोवेळी कौन्स्युलर नियुक्ती गरजेचे आहे. मात्र, याबाबत महापालिकेला जाग आलेली नाही, हे ठाणेकरांचे दुर्देव आहे, अशी टीका आमदार डावखरे यांनी पत्रकद्वारे केली आहे.

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.