भाजपा शिक्षक सेलची शालेय शिक्षण विभागाकडे मागणी
कल्याण : केंद्रीय बोर्डाने आपल्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली असतांना राज्यशासन आपल्या राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांबाबत कधी निर्णय घेणार असा सवाल भाजपा शिक्षक सेलचे मुंबई विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारला असून तातडीने शिक्षणतज्ञांच्या मदतीने ९ वी ते १२ वी चा अभ्यासक्रम निश्चित करण्याची मागणी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून अभ्यासक्रम कपात करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे
कोरोनाचे संकट लस आल्याशिवाय संपणार नाही. प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार हे कुणीही सांगू शकत नाही. महाराष्ट्रात व विशेषतः मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षक “वर्क फ्रॉम होम” करून जमेल तसं ऑनलाईन शिक्षण देत आहेत. ५० विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गातील केवळ १५ ते २० विद्यार्थीच ऑनलाईन वर्गाला हजर राहतात. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही. ज्यांच्या घरात आहे तो पालकांकडे असल्याने व पालक कामावर जात असल्यांने मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागतेय.
त्यातच शिक्षकांना अभ्यासक्रम कपातीची कोणतीही सूचना नसल्याने शिक्षक सर्व अभ्यासक्रम शिकवीत आहेत. राज्यातील निम्म्याहून अधिक मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या राज्यमंडळाने ९ वी ते १२ विच्या अभ्यासक्रमात कपात करण्याच्या बाबत शिक्षणतज्ञांची कमिटी नेमून तातडीने निर्णय घ्यावा व शाळांना तशा सूचना द्याव्यात अशी मागणी भाजपा शिक्षक सेल मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
424 total views, 1 views today