कंत्राटदाराने मागवले पश्चिम बंगालमधून मजदूर
मुंबई : कल्याण येथे पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम मेपर्यंत पुर्ण करण्याचा प्रयत्न होता. परंतु,कल्याण-डोंबिवली येथील कोवीड-१९ च्या प्रार्दुभावामुळे तसेच पूर्ण देशस्तरावर लॉकडाऊन घोषित केल्यामुळे २३ मार्चपासून हे काम ठप्प झाले होते. परंतु, दुसऱ्या लॉकडाऊनमधील काही अटी व शर्तींचे पालन करुन हे काम सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत परवानगी दिली होती. तेव्हापासून २ एप्रिल २०२० पासून काही मोजक्या मजुरांद्वारे सदरचे काम सुरु करण्यात आले आहे.
आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वत: जागेवर पाहणी करुन संबंधित कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन कामाचा आढावा घेतला.
या कामासाठी अत्यंत कुशल मजुरांची आवश्यकता असते. त्यानुसार कंत्राटदाराने विशेष करुन पश्चिम बंगालमधुन मजूर उपलब्ध करण्यात आले आहे. पुलाच्या स्तंभाचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीच्या गाळयाचे लाँचिग करण्याकरीता आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच गाळयाचे कामही हैद्राबाद येथे पूर्ण झाले असून सर्व साहित्य पुढील १० दिवसामध्ये प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होईल व पुढील महिन्यापासून लाँचिग प्रक्रिया पूर्ण करुन ऑगस्टअखेर हा पूल वाहतुकीकरीता उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
याच ठिकाणी तिसऱ्या पत्रीपुलाचे कामही जुलै महिन्यापासून सुरु होत आहे. त्याचे आवश्यक नकाशे व संकल्पने अंतिम झाले असून प्रत्यक्ष काम जुलैमध्ये सुरु करुन पुढील एक वर्षाच्या कालावधीत या पुलाचे काम पूर्ण होईल व यामुळे, कल्याण-डोंबिवलीमधील नागरीकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी सुटेल.
628 total views, 1 views today