महिनाभरात विद्युत पुरवठा सुरळीत होणार – अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी यांनी दिली सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना माहिती
पनवेल: सुकापुर बालाजी सिंफनी येथील सब स्टेशनमधून दोन नव्या विद्युत वाहिन्या आणि फिडर जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने महिनाभरात ते काम पूर्ण होऊन नेरे परिसरातील ५४ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पनवेल ग्रामीण विभागाच्या महावितरणचे अतिरिक्त अभियंता स्वामी यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून नेरे, कोप्रोलीपासून विभागातील माथेरानच्या पायथ्यापर्यंतच्या गावांतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याबाबत कडू यांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता माणिकराव राठोड यांच्याशी संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासंदर्भात सुचना केली.
त्यानंतर स्वामी यांना याबाबत सांगितले. त्यांच्याकडून माहिती घेतली. काल रात्री तक्का येथील गाढी नदीवरून जाणारी विद्युत वाहिनी तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक तक्रारी कडू यांच्याकडे आल्या होत्या. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे आहे, असे कडू यांनी स्वामी यांना पटवून दिले आहे.
९६ किलो मीटर अंतरापर्यंतच्या ५४ गावात विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी दोन नवे फिडर बसवण्याचे काम सुरू असून विभागीय अभियंता यमगर, शेळके आणि त्यांची टीम कार्यरत आहे.
थोडे अडथळे आहेत, पण हे काम पूर्ण होऊन सूकापूर पासून नेरे विभागातील माथेरानच्या पायथ्यापर्यंतच्या पनवेल तालुक्यातील ५४ गावांचा विद्युत पुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे.
नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, तुमचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून नव्या फिडरसाठी नवे खांब उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कडू यांनी दिली.
710 total views, 1 views today