पाणीटंचाईची कामे जलद गतिने पूर्ण करा

मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिले निर्देश

दृकश्राव्य माध्यमातून घेतला पाणी टंचाईचा आढावा

ठाणे  : कोरोनाच्या संकटाचा लढा सुरु असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात  पाणी टंचाई निर्माण होण्यापूर्वी पाण्याचा ट्रॅंकर गाव पाडे वस्त्यांवर पोहोचायला हवा. शिवाय ठिकठिकाणी सुरु असणारी टंचाईची कामे जलद गतिने पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. आज त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून पाणी टंचाई कामांची आढावा बैठक घेतली.

या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांच्यासह उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) तथा कल्याण तालुका संपर्क अधिकारी  डी. वाय. जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार ( पंचायत ), उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी पुरवठा ) तथा शहापूर संपर्क अधिकारी छायादेवी शिसोदे, शिक्षणाधिकारी तथा भिवंडी तालुका संपर्क अधिकारी संगीता भागवत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास ) तथा मुरबाड संपर्क अधिकारी संतोष भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा अंबरनाथ तालुका संपर्क अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेन्घे,कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) एच. एल. भस्मे, गट विकास अधिकारी शहापूर अशोक भवारी, गट विकास अधिकारी मुरबाड रमेश अवचार, गट विकास अधिकारी भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी अंबरनाथ शीतल कदम आदि अधिकारी यांनी सहभाग घेतला.

एप्रिल-मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात गावांमध्ये असणारे पाण्याचे विविध स्त्रोत आटल्याने पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे दरवर्षी टंचाई आराखडा मंजूर करून त्या माध्यमातून पाणी टंचाई कामे मार्गी लावली जातात. यंदा जरी कोरोनाचे संकट असले तरी जिल्हा परिषदेने योग्य खबरदारी घेत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात टंचाई कामे सुरु केली आहेत.

आजच्या घडीला शहापूर तालुक्यात ३७ गावं आणि ११९ पाड्यांवर ३१  ट्रॅंकर पाणी पुरवठा केला जात आहे. तर मुरबाड मध्ये ४ गावं आणि १८ वाड्यांवर पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एच. एल. भस्मे यांनी दिले.  त्याच बरोबर  भिवंडी तालुक्यात ८१ ठिकाणी विधन विहिरी ( बोरवेल ) चे काम सुरु झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी वाफे गावात  टंचाई कामांची पाहणी देखिल केली.

कोरोनाच्या सध्यस्थितीचा घेतला आढावा

या दरम्यान सोनवणे यांनी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी, शहापूर या पाचही तालुक्यातील कोरोनाची सध्यस्थिती जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून खबरदारीच्या उपायोजना करण्यात आहेत.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागासह इतर सर्व विभाग कार्यरत आहे. नेमून देण्यात आलेले संपर्क अधिकारी वेळोवेळी तालुक्यांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

 509 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.