रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून जाणार
मुंबई : मुंबईला नागपूरबरोबर जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर, पाचशे किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
शिवडी ते न्हावा शेवा पोर्ट जिथे संपतो त्या रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पात्रादेवी पर्यंत सुमारे पाचशे किलोमीटर लांबीचा
हा महामार्ग असेल. या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनार्याजवळून करण्यात येणार आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल, शिवाय समुद्रकिनार्यालगतच्या पर्यटन विकासालाही चालना यामुळे मिळेल. पर्यटनाबरोबरच कृषी उद्योगालाही चालना मिळावी अशी अपेक्षा या महामार्गाच्या निर्मितीमागे आहे. या महामार्गामुळे कोकणातील हापूस आंबा काजू सुपारी नारळ इत्यादी उत्पादनांसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे हा महामार्ग कोकणसाठी विकासाचा महामार्ग ठरावा अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास तंत्र आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व्यतिरिक्त हा वेगळ्या महामार्ग असल्यामुळे यामुळे राष्ट्रीय महामार्गावर येणारा ताणही कमी होईल अशी अपेक्षा आहे.
558 total views, 1 views today