राकेश नाईकच्या २५ धावांच्या मोबदल्यातील पाच विकेट्स आणि सलामीवीर जयदीप परदेशीचे ५२ चेंडूतील नाबाद ५० धावा हे ठाणे महानगरपालिकेच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेने सेंच्युरी रेयॉनचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव करत ठाणेवैभव स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३५ षटकांच्या ४७ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील क गटाचे विजेतेपद संपादन केले. राकेश नाईकच्या २५ धावांच्या मोबदल्यातील पाच विकेट्स आणि सलामीवीर जयदीप परदेशीचे ५२ चेंडूतील नाबाद ५० धावा हे ठाणे महानगरपालिकेच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात खेळलेल्या निर्णायक सामन्यात राकेश नाईकच्या भेदक माऱ्यासमोर सेंच्युरी रेयॉनचा डाव २६.३ षटकात १०३ धावांवर गडगडला. त्यांचा आशुतोष माळी (२९) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रोशन जाधवने १७, संदीप बोराडे आणि प्रशांत तर्णेने प्रत्येकी १६ धावा केल्या. सेंच्युरी रेयॉनचा अर्धा संघ गारद करणाऱ्या राकेशसह हर्षल सोनीने २, निखिल बागुल, शशिकांत कदम आणि जयेश पाटीलने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
उत्तरादाखल ठाणे महानगरपालिकेच्या विकी पाटील आणि जयदीप परदेशीने संघाला सावध सुरुवात करुन दिली. विकी पाटील वैयक्तिक ८ धावांवर बाद झाल्यावर जयदीप आणि अर्जुन शेट्टीने संघाची आणखी हानी होऊ न देता संघाला दुसऱ्यांदा ठाणेवैभव चषक जिंकून दिला. जयदीप ५० आणि अर्जुन ४३ धावांवर नाबाद राहिला. या डावतील एकमेव विकेट रोशन जाधवने मिळवली.
संक्षिप्त धावफलक : सेंच्युरी रेयॉन : २६.३ षटकात सर्वबाद १०३ ( आशुतोष माळी २९, रोशन जाधव १७, संदिप बोराडे १६, प्रशांत तर्णे १६, राकेश नाईक ७-२-२५-२, हर्षल सोनी ५-२८-२, निखिल बागुल ४-१-१७-१, शशिकांत कदम ७-१-२१-१, जयेश पाटील २.३-१०-१) पराभूत विरुद्ध ठाणे महानगरपालिका : १५.१ षटकात १ बाद १०७ ( जयदीप परदेशी नाबाद ५०, अर्जुन शेट्टी नाबाद ४३, रोशन जाधव १.१-१६-१).
67,265 total views, 1 views today