ठाणे महापालिकेच्या “एक हात मदतीचा” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

१ गाडी अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू आज चिपळूणला रवाना

 ठाणे  – कोकणात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ”एक हात मदतीचा” या सामाजिक उपक्रमाला ठाणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून जमा झालेली १ गाडी अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत आज चिपळूण येथील नागरिकांना वाटण्यासाठी रवाना करण्यात आली.

कोकणवासीयांना अतिवृष्टी व पुरामुळे मोठया प्रमाणात फटका बसलेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिवीत व वित्तहानी झाली असून या ठिकाणांच्या नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्या अनुषंगाने तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात आला आहे.  ठाणेकरांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले होते.  ठाणेकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच इतर जीवनावश्यक वस्तू महानगरपालिकेकडे जमा केल्या आहेत.

यामध्ये रेशन व इतर जीवनावश्यक वस्तुंची एकुण १६३ किटस् , पोळपाट लाटणे ७०० नग, तांदुळ -६१० किलो, हळद २०० पाकिट,  मसाला पाकिट २०० नग, डेटॉल साबण ३०० नग, पीठ १२० किलो, बिर्याणी (रेडी टू इट) ५२ बॉक्स, सूर्यफुल तेल ६० लिटर, प्लॉस्टीक बादली – २० नग, मीठ २५ किलो, तुरदाळ ७ किलो,  विमबार ६० नग, हरभारे ५ किलो, बिसलरी २४ बॉक्स, कपडे ४४ गोणी, लायटर ५० नग, भांडी १ गोणी,  फिनेल ५० नग, मेणबत्ती ५० नग, आणि घासणी ४ नग आदी मदत जमा झाली आहे. ही सर्व मदत आज चिपळूण येथे रवाना करण्यात आली असून अतिवृष्टी व पुरामध्ये बाधित झालेल्या लोकांना वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान ठाणे महानगरपालिकेचा ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम ऑगस्टच्या पहिल्या आठवडयापर्यंत राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होवून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

 289 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.