कल्याण व अंबरनाथ ग्रामीण भागातील विविध विकासकामांना गती देण्याचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे निर्देश
विविध विकासकामांचा खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला सखोल आढावा
ठाणे – कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण व अंबरनाथ ग्रामीण भागातील विविध विकासकामांचा आढावा घेण्याकरिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ग्रामीण भागातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना, आरोग्य यंत्रणा, शिक्षण विभाग, महिला बालविकास विभाग व अशा प्रकारच्या मुलभूत विकासकामांसंदर्भात चर्चा करत भागातील विकास कामाचा सखोल आढावा घेतला.
ठाणे तसेच मुंबईच्या धर्तीवर पाणीपुरवठा करण्याकरिता श्री. मलंगगड परिसरात नवीन पाणी पुरवठा योजना राबवून तेथील गावातील व गडावरील नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. तसेच निळजे येथील आरोग्य केंद्र श्रेणीसुधारित करून नावाळी येथे नवीन आरोग्य केंद्र उभारणे, कल्याण व अंबरनाथ तालुक्यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे आणि मौजे मांगरूळ तालुका अंबरनाथ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यकत्या कार्यवाही करण्याची सूचना खा.डॉ. शिंदे यांनी केली.
सदर नियोजित बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अध्यक्ष पुष्पा बोऱ्हाडे पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि पशु दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र) अजिंक्य पवार तसेच संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री. मलंग गडावरील नागरिकांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत गडगा नाका परीसर किंवा डोंगराच्या पायथ्याशी नवीन बोर घेऊन त्यातील पाणी संप (जमिनी मधील टाकी) मध्ये जमा करून विद्युतपंपा द्वारे उचलून मलंगगडावरील आँस्ट्रलियन टाकीमार्फत पुरवठा करावा तसेच आँस्ट्रलियन टाकीमध्ये साठवण करावे. गडावर वितरण पाईप लाईन करून यात्रेकरू व स्थानिक नागरिकांची पाण्याची सोय करावी अशी सुचना केली. तसेच गडावरील पारंपारिक टाकीची दुरुस्ती करून किंवा इतर पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध होतील असे प्रयत्न करावे. गडावरील नागरिकांची व यात्रेकरू यांची कायमस्वरूपी पाण्याची समस्या कशी मिटेल यासाठी प्रत्येक गावांमध्ये बंदारे बांधण्यासाठी उपाययोजना करताना मलंगगड पट्यातील सर्व गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एमजेपी मार्फत नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबवावी, तसेच अशी सूचना देखील खा.डॉ. शिंदे यांनी केली.
त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाच्या कृती आराखडा मधील कामे लवकर पूर्ण करून आराखडा बाहेरील गावामध्ये देखील घनकचऱ्याचे काम करण्याची सूचना केली. तसेच घनकचरा विलगिकरनाचे ५ ते १० गावामध्ये प्लांट उभे करून आदर्शवत असे मॉडेल उभे करण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील निम-शहरी गावामध्ये घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे करता येईल याचे नियोजन करणे तसेच प्रत्येक गावांमधील लोकसंखेनुसार स्वतंत्र कंपोस्ट प्लांट तयार करून नवीन मॉडेल तयार करण्याची सूचनाही खासदार डॉ. शिंदे यांनी केली.
तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचा आढावा घेत, खा.डॉ. शिंदे यांनी जनसुविधा योजना, १४ गावातील विविध प्रलंबित विकासकाम, नारिवली – बाळे – वाकळण या गावांना बाळे येथील अर्धवट पाण्याची टाकी व नार्हेन फाटा येथे टॅपिंग करणे आणि तौक्ते वादळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळणेबाबत जिल्हा परिषदेने आवश्यक तात्काळ कार्यवाही करण्याची त्यांनी सूचना केली. खा.डॉ. शिंदे यांनी दिलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करून विकासकामांना गती देण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
289 total views, 1 views today