फोटोसेशन करायला नाही; कोकणवासीयांना दिलासा द्यायला आलोय – मुख्यमंत्री

रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही  


रत्नागिरी – कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतर ठरवणार, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सोबतच पंतप्रधान नरेंद्र केंद्राकडून महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, “मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही.”असं म्हणत मुखमंत्रानी विरोधकांना निशाणा साधला आहे. 


तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे केले. जिल्हयात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीतआढावा घेतला. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळाने जिल्हयातील ५ तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. यात अधिक नुकसान  राजापूर व रत्नागिरी तालुक्यात आहे. वादळाचा फटका बसलेल्या सिंधुदूर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्हयांचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. याची सुरुवात रत्नागिरी येथील बैठकीने झाली.

जिल्हयात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर  पंचनामा योग्य पध्दतीने करुन नेमेकेपणाने आकडेवारी सह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.

कोव्हीड आढावा

या वेळी जिल्हयातील कोव्हीड परिस्थितीचाही आढावा याच बैठकीत घेण्यात आला. रुग्णांना चांगली उपचार सुविधा आपण देत आहोत. सोबतच रुग्णसंख्या प्रामुख्याने मृत्यूचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून  सर्वांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येईल असे म्हटले जात असले तरी योग्य ती खबरदारी आणि उपाय योजल्याने आपण ती येणारच नाही यासाठी येणाऱ्या  काळात प्रयत्न करु असे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्यात  सुरु असणारे लसीकरण आणि त्याबाबतीत इतर माहिती यावेळी सादर करण्यात आली.

मोठया प्रमाणावर नुकसान

जिल्हयात झालेल्या नुकसनीबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्हयात २ जणांचा मृत्यू झाला असून ८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे. जिल्हयात १७ घरे पूर्णत: बाधित झाली असून  अंशत: बाधित घरांची संख्या ६७६६ आहे. यात सर्वाधित दापोलीत २२३५ आहेत. रत्नागिरी तालुक्यात १०८४ तर राजपूरातील  ८९१ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गोठयांची जिल्हयातील ३७० इतकी आहे. वादळात वाऱ्यामुळे १०४२ झाडे पडली. यात सर्वाधित ७९२  झाडे राजापूर तालुक्यात पडली. रत्नागिरीत ही संख्या २५० इतकी आहे. चक्रीवादळात ५९ दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६  आहे. या सर्व शाळा राजापूर आहेत.

शेती

चक्रीवादळाने मोठया प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे ११०० शेतकऱ्यांचे या साधारण २५०० हेक्टर इतके नुकसान झाले. यातील ३४३० शेतकऱ्यांच्या  ८१०.३० हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

वीज

चक्रीवादळाचा सर्वाधित फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा आता पूर्ववत झाला आहे.

बाधित उपकेंद्राची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्ती देखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले. गावागावात पडलेल्या वीज खांबाची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.

मत्स्य व्यवसाय

जिल्हयातील समुद्रकिनाऱ्यावर  आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटी पूर्णत: तर ६५ बोटींचे अशंत: नुकसान झाले. ७१ जाळयांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान ९० लाख रुपयांपर्यंत आहे. या चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झालेल्या आहे. अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार पेक्षा जास्त अधिक नुकसान आहे.

ई-उद्घाटन

जिल्हा पोलिसांतर्फे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.याचे ई-उद्घाटन याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केंद्राबाबत योवळी माहिती दिली तसेच  त्यावरील एक लघुपट यावेळी दाखवण्यात आला.

साधेपणाने बैठक

बैठकीसाठी व्यासपीठ उभारले असले तरी तेथे न जात मुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठा समोरील डी मध्ये खुर्च्या लावण्यास सांगितले व साधेपणाने सादरीकरण व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्वागतासाठी हार – बुके देखील नको अशा सूचना दिलेल्या असल्याने साध्या पध्दतीनेचे पूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार  हुस्नबानु खलिफे, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंडया साळवी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा इन्दुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदि मान्यंवर उपस्थित होते.

 266 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.