सर्व महापालिकांच्या हद्दीतील रस्त्यांची डागडुजी मे अखेरपर्यंत पूर्ण करा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या जीवाला धोका लक्षात घेता येत्या पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा ठेवण्याचे उद्दिष्ट

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या डागडुजीची कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जिल्ह्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी बोलताना त्यांनी हे निर्देश दिले.

त्यासोबतच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाच येणारा मान्सून हा आपल्या सगळ्यांची कसोटी पाहणारा असेल. त्यामुळे त्यासाठी सगळ्यांनाच सज्ज राहावे लागणार असल्याचे त्यानी स्पष्ट केलं. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांत कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, त्यातील काही जण अतिदक्षता विभागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात काहीही करून अखंडित वीज पुरवठा चालू राहील आणि वीज नसल्याने कुणाचा जीव जाणार नाही, याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महापालिकांच्या मान्सूनपूर्व तयारीचा त्यांनी आढावा घेतला. यात प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक स्वच्छता, नालेसफाई, रस्त्यावरची उघडी मेनहोल्स त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी शक्य ते सारे करण्याचे निर्देश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले.  त्यासोबतच धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे स्थलांतर, पूरजन्य भागात बोटींची आवश्यकता, प्रत्येक मनपा अंतर्गत येणारे कंट्रोल रूम यांची व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देशही दिले.

पावसाळ्यासोबत येणारे आजार टाळण्यासाठी साथ रोगांची औषधे, बेड्स याबाबत वैद्यकीय विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यासोबत लँड स्लाइड, पाणी भरणे, पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफची तीन पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले.

पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकांचे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवणे, आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य अद्ययावत ठेवणे, जेसीबी, पोकलेन, क्रेन तयार ठेवणे, याशिवाय गोतेखोर, गावातील पट्टीचे पोहोणारे यांची यादी सज्ज ठेवणे, याला प्राधान्य देण्यासही त्यांनी सांगितले. रेल्वेच्या अखत्यारीतील नालेसफाई, रुळांची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यासोबत एमआयडीसी भागातील रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक झाडांची छाटणी, उघड्या वीजतारांची दुरुस्ती ताबडतोब करण्याचे आदेश दिले. एमटीएनएल आणि बीएसएनएल यांनी त्यांची कामे वेळेत करावीत; ऐन पावसाळ्यात खड्डे खणून ठेवू नयेत, असेही त्यांनी या अधिकाऱ्यांना बजावले.

या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि एमएमआर रीजन मधील महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 307 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.