भाजपच्या अर्चना पाटील यांचा पालिका प्रशासनला इशारा!
पाण्याचे नियोजन नसल्याने कोरोना काळातही पाणी टंचाईने लोकांचे प्रचंड हाल
दिवा – मागील अनेक महिने साबे गावातील डीजे कॉम्प्लेक्स मधील पाणी टंचाई दूर करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दिवा प्रभाग समिती प्रशासनाला भाजपच्या अर्चना पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकीकडे कोरोनाची महामारी असताना लोकांना पाण्यासाठी एकाच विहिरीवर गर्दी करावी लागते,यामुळे कोरोना वाढीचा धोकाही निर्माण होतो.लोकं कोरोना आणि भीषण पाणी टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहेत याकडे भाजपच्या अर्चना पाटील यांनी लक्ष वेधले आहे.दिव्यामध्ये जीवदानी नगर, साळवी नगर, बी आर नगर, मुंब्रा देवी कॉलनी, दिवा पश्चिम, भगतवाडी परिसर, तसेच साबेगाव, संपूर्ण साबे विभाग, यशोदा बा पाटील नगर (डी जी कॉप्लेक्स ) या परिसरात पाणी टंचाई असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले असून या प्रश्नाकडे सरकार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष का देत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे कोणतेही नियोजन नसल्याने दिवा साबेगाव, यशोदा बा. पाटील ( डी जी कॉम्प्लेक्स) परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना पाणी मिळत नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
पाणी मिळत नसल्याने लोकांच्या दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पाणी पुरवठा होत नसल्याने अशा लोकांना, विशेषत: गरिबांना पाण्यासाठी त्यांच्या घराबाहेर जावे लागते. पाणी मिळवण्यासाठी अतिरिक्त खर्चाचा भोजा त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे अर्थातच, गरिबांना एकीकडे पोटापाण्यासाठी झगडावे लागते तर, दुसऱ्या बाजूला रोजच्या वापरासाठी पाणी मिळवताना संघर्ष करावा लागतो. तसेच (कोविड-१९) कोरोनाचा सामना सुद्धा करावा लागतो. या परिसरात ५५०० कुटूंबाची लोकवस्ती असून सुद्धा गेले ८ वर्षात यशोदा बा पाटील नगर (डी जी कॉप्लेक्स) परिसरात साधी पाण्याची लाईन टाकली नाही याकडे अर्चना पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
12 इंच लाईन वरून पाण्यासाठी भाजपचे निलेश पाटील यानी पालिकेकडे मागणी सुध्दा केलेली आहे. जवळ असणाऱ्या विहिरीचा थोडासा सहारा आहे. परंतु कोविड -19 चे कडक नियम आहेत. विहिरीवर पाणी भरण्यासाठी कोरोना काळातही गर्दी असते.जीवन जगवण्यासाठी पाणी तर लागतेच. विहिरवर एवढ्या गर्दी मधून जर कोणाला कोरोना झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. येत्या आठ दिवसांत या भागाला पाणी पुरवठा न केल्यास प्रभाग समिती येथे जनता हंडा कळशी मोर्चा काढून घेराव घालेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेची असेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
328 total views, 1 views today