महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार असंवेदनशील – रेखा चौधरी
कल्याण : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर भाजपा महिला आघाडी आक्रमक झाली असून कल्याणमध्ये त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. राज्यात महिला असुरक्षित असून ठाकरे सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याची टीका भाजपा महिला जिल्हाध्यक्षा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी केली आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा त्वरीत घ्यावा या मागणीसाठी कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्या नेत्तृत्वाखाली महिलांनी निदर्शने करून तहसीलदार कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी, जिल्हा उपाध्यक्षा अर्चना सूर्यवंशी, प्रिती दिक्षित, सुचिता होळकर, जिल्हा सोशल मिडिया संयोजिका प्रियंका मराठे, वकील सहसंयोजिका सविता गुप्ता, कल्याण पूर्व मंडलाध्यक्षा प्रिया जाधव, डोंबिवली पूर्व मंडलाध्यक्षा पूनम पाटील, अंबरनाथ पश्चिम मंडलाध्यक्षा पौर्णिमा पाटील, रेखा तरे, आदी पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार अत्याचारविरोधात एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी पिडीत महिला स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जात आहे. मात्र पोलीस स्टेशनने तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. म्हणून या महिलेने मुंबई पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले. परंतू आजपर्यंत पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कोणतीही महिला एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी आली तर त्वरीत तक्रार दाखल करावी असे केंद्र सरकारचे निर्देश असतांना देखील केवळ राजकिय दबावापोटी ही केस खोटी आहे असे कारण देऊन पोलीस केस नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत. या केसचा खरेखोटेपणा ठरविण्याचा अधिकार न्यायालयास आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून आपले पिडित महिलेच्या बहिणीशी परस्परसंमतीने विवाहबाळय संबंध असून सदर नात्यातून मला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये असुन त्यांना मी माझे नाव दिले आहे व हा सर्व प्रकार माझ्या लग्नाच्या पत्नीला व मुलांना माहिती आहे असा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या फेसबुक वरील वक्तव्यावरून त्यांना एकूण पाच अपत्येक असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची वस्तुस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांना निवडणूक आयोगाची व पर्यायाने जनतेची फसवणुक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेवर आजपर्यंत भाष्य केलेले नाही. त्यामुळे महिलांच्या बाबतीत ठाकरे सरकार असंवेदनशील असल्याची टीका भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांनी यावेळी केली.
295 total views, 1 views today