शिवप्रतापदिन हा आसुरी प्रवृत्तींवरील विजय असल्याने हिंदूंनी तो दिवाळी-दसर्‍याप्रमाणे साजरा करावा !

  
                 
शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ‘शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम…अफजलखान वध’ या विषयावर संवाद साधताना इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी केले आवाहन


मुंबई : भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याचा दिवस दिवाळी म्हणून साजरा होतो, तर श्रीरामाने रावणाचा वध केल्याचा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो. एकूणच आसुरी प्रवृत्तींवर विजय मिळवल्यावर हिंदु संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६१ वर्षांपूर्वी अर्थात् मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीला हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. कमी सैन्यबळ आणि कमी शस्त्रबळ यांच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी केलेला हा पराक्रम जगभरात उत्कृष्ट युद्धनीती अन् युद्ध कौशल्य म्हणून अभ्यासला जातो. आपल्यातही अशा पराक्रमाची प्रेरणा निर्माण होण्यासाठी शिवप्रतापदिन हा दिवाळी-दसर्‍याप्रमाणे उत्साहात साजरा करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातील इतिहास समितीचे सदस्य मोहन शेटे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने ‘शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम…अफलजखान वध’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून हा कार्यक्रम २९१६३ जणांनी प्रत्यक्ष पाहिला, तर २,०२,६७३ लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला. शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी समितीने केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रभरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ठिकठिकाणी करण्यात आले. तसेच शिवप्रेमींनी ट्विटरवर #ShivpratapDin या हॅशटॅगने केलेला ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर दुसर्‍या क्रमांकावर होता.
या वेळी प्रसिद्ध लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले की, आपण शिवछत्रपतींनी गनिमी काव्याने युद्धे जिंकली असे सरसकट म्हणतो; पण गनिमी कावा याचा अर्थ शत्रूचा कपटयुक्त हल्ला असा होतो. त्यामुळे आपण गनिमी कावा न म्हणता त्याला युद्ध कौशल्य म्हटले पाहिजे. अफजलखानासारख्या बलाढ्य आणि मोठे सैन्यबळ असलेल्या शत्रूला कूट युद्धनीतीचा वापर करून ठार मारले. अशी अनेक प्रतिकूल परिस्थितींतील युद्धे शिवाजी महाराजांनी युद्ध कौशल्याच्या बळावर जिंकली आहेत. त्यांचे हेरखाते चांगले होते आणि प्रत्येक युद्धाची स्वतंत्र रणनीती असायची.
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक  सुनील घनवट म्हणाले की, शिवकालीन शिलालेखात ‘हे हिंदूराज्य जाहले’, असा स्पष्ट उल्लेख आहे. तरी काही स्वयंघोषित इतिहासकार शिवछत्रपतींना सेक्युलर आणि मुस्लिमप्रेमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही अफजलखानवध आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याच्या चित्रांना लावण्यास विरोध केला जात आहे. दुसरीकडे अकबर, औरंगजेब, जहांगीर, शहाजहान, बाबर आदी मोगल आक्रमकांच्या नावांची देशात ७६० हून अधिक गावे-शहरे आहेत. ती बदलली पाहिजेत. यातून खरा इतिहास दडपला जात आहे. हिंदूंना खरा इतिहास आणि शौर्य शिकवल्यास हिंदु राष्ट्राच्या दिशेने पाऊले टाकली जाऊ शकतात. 
                           

 348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.