अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे डिसेंबर महिन्यात संसर्गजन्य आजारांमध्ये होणार वाढ

कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन


मुंबई : मानवाच्या आरोग्यावर जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यांसारख्या शत्रूंचे हल्ले होत असताना कोरोना महामारीने संपूर्ण मानवजातीच संकटात आली होती आता त्यासोबतच पर्यावरणात  झालेला बदल म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मधूनच कधी कडाक्याची थंडी जाणवते तर कधी वातावरण ढगाळ होऊन अकाली पाऊस पडायला लागतो. कडक ऊन असतानाही हवेत गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. वातावरणात झालेल्या या बदलांमुळे साथीचे म्हणजेच संसर्गजन्य  आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. गेल्या आठ दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे व  मळभट वातावरणामुळे अंग मोडून पडणं, अनुत्साही वाटणं, डोकं दुखणं अशा आजारात वाढ झाली आहे.  याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे  छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ  डॉ. जिग्नेश पटेल सांगतात, “अचानक वाढलेला उष्मा व  थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाही तर ते आजार बळावण्याची शक्यता असते. सकाळी थंडी व दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे नागरीक  विशेषतः लहान मुले तहान भागवण्यासाठी  शितपेय व थंड पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करीत असल्यामुळे  लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे लहान मुलांना थंड शितपेय व आईस्क्रीम देणे टाळावे. सध्या मुंबई व लगतच्या शहरांमध्ये धुक्याची चादर आपणास अनुभवास मिळत असली तरी हे धुके आरोग्यासाठी धोकादायक आहे, कारण दिवस रात्री शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरांना जोडणारे रस्ते अक्षरश: हजारो वाहने ये-जा करत असल्यामुळे वाहनातून निघणारा धूर या धुक्यात मिसळल्यामुळे धुरके तयार होत असून याचा गंभीर परिणाम  मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांना तसेच ज्यांना  कोरोनाची लागण झालेली होती अशा नागरिकांना हा काळ धोकादायक आहे. या बदललेल्या वातावरणामुळे मानसिक अस्थैर्यही निर्माण होत असून नैराश्य, चिडचिडेपणा, डिप्रेशन या अशा गोष्टी नागरिकांमध्ये बळावत आहेत. दमट वातावरणामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये बीपी कमी होऊ सातत्याने घाम येणे, दम लागणे, अशक्तपणासारखे विकार उद्भवत आहेत. त्यामुळे काम असेल तरच  घराबाहेर पडावे. ” कोरोना संक्रमण  व थंडीचा मोसम याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियन डॉ प्रवीण भुजबळ म्हणाले, “आपल्या देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्याच्या वर पोहोचला आहे, परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे महिने कोरोनासाठी आव्हानात्मक असणार आहेत यासोबतच गेल्या काही वर्षाच्या वैद्यकीय अनुमानानुसार भारतामध्ये हिवाळ्यामधे श्वासासंबंधीत आजार वाढीस लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लू व दम्याचे आजार या काळात वाढीस लागतात म्हणूनच ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे अशा नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे कारण त्यांची श्वसन यंत्रणा कोरोनाच्या संसर्गामुळे कमकुवत झालेली असते. कोरोना आजारातून बरे झालेल्या १० ते २० टक्के रुग्णांमध्ये फायब्रोसिस म्हणजेच फुफुसामध्ये जंतूंचा संसर्ग होण्याचे प्रमाण दिसून आले आहे ,अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, खोकला येणे व थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळून येतात. कोरोनानंतर आलेला हा पहिला थंडीचा मोसम आहे व त्यातच पाऊस पडल्यामुळे संसर्गजन्य आजारात वाढ होण्याची दाट शक्यता असल्यामुळे कोरोना झालेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. मुंबई व लगतच्या उपनगरांत म्हणजेच ठाणे कल्याण बदलापूर नवी मुंबई शहरात दोन आठवडाभरापूर्वी उच्चांक गाठणारा ३० ते ३५ अंशावरील तापमानाचा पारा आता २० ते २२ अंशावर आला असून, वातावरणातील गारवा खूप वाढला आहे. उत्तर-पूर्वेकडून थंड हवा आणि पश्चिमेकडून येणारी उबदार हवा यांच्या मिश्रणामुळे सध्या मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरक्याचे साम्राज्य पसरले आहे. या धुरक्यामध्ये वाहनांचा धूर मिसळत असल्याने ‘क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) अर्थात काळ्या दम्याच्या श्वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा  नागरिकांना पडत आहे.”

 470 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.