विद्यापीठ उपकेंद्रामधील विधी शाखेचे विद्यार्थी गुणपत्रिकेपासून वंचित

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा

ठाणे : ठाणे शहरातील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात विधी आणि न्याय शाखेच्या सुमारे ३६ विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून गुणपत्रिकाच देण्यात आल्या नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना १५ दिवसांत गुणपत्रिका दिल्या नाहीत तर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहाराध्यक्ष विक्रम खामकर यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षा पल्लवी जगताप आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहारध्यक्ष प्रफुल्ल कांबळे आिंण आज मुंबई विद्यापीठाच्या बाळकूम येथील उपकेंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान सदर प्रकार उघडकीस आला.
या उपकेंद्रामध्ये साधारणपणे ३६ विद्यार्थी एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. सुमारे चार वर्षे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना एकाही वर्षाची गुणपत्रिकाच देण्यात आलेली नाही. केवळ सूचना फलकावर निकाल जाहीर करण्यात येत असतो. मात्र, या निकाल जाहीर करताना कोणाला एटीकेटी लागली आहे, याची नोंद केली जात नसल्याने पुन:र्तपासणीसाठी अनेक विद्यार्थ्यांकडून ९९९ रुपये उकळले जातात. मात्र, त्यानंतर सदर विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण झाले असल्याचे समजते. त्यामुळे मुलांचे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसतो. उपकेंद्राच्या समन्वयक म्हणून राऊत नावाच्या एक महिला अधिकारी आहेत. मात्र, त्यादेखील तेथे उपस्थित नसतात. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असूनही स्वतंत्र फॅकल्टीची निर्मिती न करता तात्पुरत्या कारभारावर हे शिक्षण सुरु आहे. त्यामुळे चार वर्षांच्या परीक्षा देऊनही गुणपत्रिकाच मिळालेल्या नसल्याने अनेक विद्यार्थी वकिलीची सनदही मिळवू शकले नसल्याचे उघडकीस आले असल्याचे खामकर यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी १५ दिवसात या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दिल्या नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विक्रम खामकर यांनी दिला आहे.

 346 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.