रत्नाकर शेट्टी यांनी ४ वेळा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. १९६८साली इंदोर- मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते.
ठाणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी संघनायक रत्नाकर शेट्टी यांचे १६ नोव्हेबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ठाणे- घोडबंदर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कोरोना संसर्गामुळे नेमकेच नातेवाईक व मित्र परिवार त्यांना अखेरचा निरोप देण्यास उपस्थित होते.
रत्नाकर शेट्टी यांनी ४ वेळा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. १९६८साली इंदोर- मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब कडून खेळणाऱ्या शेट्टीची आक्रमक खेळाडू म्हणून ओळख होती. त्याकाळी साऊथ कॅनरा हा शेट्टी लोकांचा संघ म्हणून ओळखला जात असे. ते हिंद सायकल या व्यासायिक संघातून खेळत असत. या व्यासायिक संघात देखील त्यावेळी शेट्टी लोकांचा अधिक भरणा होता. जया शेट्टी (थोरला), शेखर शेट्टी, सदाशिव शेट्टी आदी खेळाडू त्यांच्या बरोबरीने खेळत. हल्ली ते किडनी निकामी झाल्यामुळे डायलीस वर होते. नेहमी प्रमाणे ते त्या दिवशी डायलिस करिता रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. ना. म. जोशी मार्ग या गिरणगावात रहाणाऱ्या शेट्टी यांचा कबड्डी प्रवास डॉ. शिरोडकर विद्यालय या मराठी शाळेतून झाला. त्यांनी मराठीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. या शाळेत प्रथम अर्जुनवीर सदानंद शेट्टे कबड्डीत त्यांचे सवंगडी होते. जुन्या काळातील एक आक्रमक खेळाडू काळाच्या पडद्या आड गेला. त्याला महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कबड्डी परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी आदरांजली दिली. त्यांच्या निधनाने कबड्डी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
311 total views, 1 views today