हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच एकमेव उत्तर

हिंदु जनजागृती समितीच्या १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्त ऑनलाईन विशेष धर्मसंवादात हिंदु जनजागृती समितीच्या चारुदत्त पिंगळे यांचे प्रतिपादन

‘आपत्काळातील जीवितरक्षण’ या ग्रंथमालिकेतील दोन ग्रंथांचे संतांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांच्या अभावामुळे देशात हिंदु समाज बहुसंख्य असूनही सतत मार खात होता. अशा वेळी हिंदु जगजागृती समितीचे डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हिंदूंसाठी विविध माध्यमांतून धर्मशिक्षण देणे चालू करण्यात आले. यांतून हिंदु धर्माचरणी होत आहेत. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण, घुसखोरी, लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद, नक्षलवाद, पाकिस्तान-बांगलादेश येथील अत्याचार पीडित हिंदु आदी अनेक विषयावर लढा देत आहेत. हिंदु धर्मावरील या सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच एकमेव उत्तर आहे. हे लक्षात घेऊन वर्ष २०१२ ते २०१९ या कालावधीत समितीने प्रतीवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’चे आयोजन केले. त्यामुळे पूर्वी अशक्य वाटणारे हिंदुसंघटन आता शक्य होत आहे. देश-विदेशांतील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या ध्येयाने राष्ट्रीय स्तरावर संघटित आणि कृतीशील होत आहेत. हे सर्व ईश्‍वर आणि संत यांच्या कृपेने साध्य होत आहे, असे कृतज्ञतापर उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी काढले. ते हिंदु जनजागृती समितीच्या १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित ‘एक कदम हिंदू राष्ट्र की ओर…’या विशेष धर्मसंवादात बोलत होते. *हा परिसंवाद ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २७८८३ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर ६७८८५ लोकांपर्यंत पोचला.
या वेळी सनातन संस्थेचे नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’आणि ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी समितीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष  गोविंददेवगिरीजी महाराज यांनी आशीर्वादरुपी शुभसंदेश दिला, तर तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके, श्रीराम सेनेचे अध्यक्ष  प्रमोद मुतालिक, मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा खटला लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे संयोजक  राहुल कौल, तसेच अनेक मान्यवर हिंदुत्वनिष्ठांचे शुभेच्छापर संदेश व्हिडिओद्वारे प्रसारित करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या यशस्वी वाटचालीविषयी सांगताना समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते  रमेश शिंदे म्हणाले, ‘पूर्वी कोणीही उघडपणे नाटक, चित्रपट, जाहिराती यांतून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करत असते; मात्र समितीने त्याविरोधात सातत्याने आणि चिकाटीने लढा दिल्याने ४०० हून अधिक विडंबने रोखण्यात समितीला यश आले. यामुळे देशभरातील हिंदू समाजही जागृत झाला असून हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर संघटितपणे आवाज उठवत आहे.’ समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट म्हणाले की, सरकार प्रत्येक क्षेत्राचे सरकार खाजगीकरण करत असतांना देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का केले जात आहे ? महाराष्ट्रातील साडेचार लाख मंदिरांच्या सरकारीकरणाचा डाव समितीने लढा देऊन विफल केला. जोपर्यंत सर्व मंदिरे भक्तांकडे येत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. या वेळी सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रांतील दुष्पवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने उभारलेल्या लढ्याची विस्तृत माहिती दिली.

 324 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.