रिक्षा संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली मागणी
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरातील रेल्वे हद्दीतील लॉकडाऊन कालावधीत बंद केलेले रिक्षास्टॅण्ड विनाविलंब वापरासाठी खुले करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने रेल्वेच्या डिव्हिजन मॅनेजर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अनलॉकच्या सद्यपरिस्थितीत स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅन्ड व रेल्वे हद्दीतील अंतर्गत रस्ते बंद असल्याकारणाने अनेक समस्या निर्माण होत आहेत. लॉकडाऊन संचारबंदी कालावधीत रेल्वे स्टेशन परिसर व रिक्षातळ व अंतर्गत रस्ते सिलबंद केलेले आहेत. राज्य शासनाने मिशन बिगेन अनलॉक अंतर्गत शहरामध्ये हॉटस्पॉट क्षेत्रा व्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये काही बाबी सुरू केल्या असल्याने हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. रिक्षा, टॅक्सी व वाहतूक वाहने व सार्वजनिक प्रवासी वाहने वाहतूक मोठया प्रमाणात सुरू झालेली आहे. स्टेशन परिसरातील रेल्वे हद्दीतील रिक्षा स्टॅन्ड व अंतर्गत रस्ते सिलबंद असल्यामुळे स्टेशन समोर प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यावर रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने रस्त्यावरच उभे राहून प्रवासी वाहतुक सेवा देतात. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था कोलमडलेली आहे.
रेल्वे हद्दीत पूर्वी पासून नियोजनबध्द रिक्षा लावण्यास स्वतंत्र रांगाचा स्टॅण्ड उपलब्धता व खाजगी वाहनांना प्रवाशांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. परंतु रिक्षास्टॅण्ड व अंतर्गत रस्ते सीलबंद असल्यामुळे रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात रिक्षा, रिक्षाचालक तसेच प्रवासी नागरिक यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. सगळ्या रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था व प्रवासी सुव्यवस्था याकरिता विनाविलंब रेल्वे स्टेशन परिसरातील बंद केलेला रिक्षा स्टॅण्ड व अंतर्गत रस्ते वापरासाठी खुले करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने रेल्वेच्या डिव्हिजन मॅनेजर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
337 total views, 1 views today