अनंत करमुसे मारहाणप्रकरणातील सुत्रधारावर कारवाई व पोलिसांचे निलंबन करा

भाजपाचे पोलिस आयुक्तांना निवेदन

ठाणे : ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणातील मुख्य सुत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तिघा पोलिस शिपायांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे भाजपाने केली आहे.
भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या आणि ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने आज पोलिस आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.
ठाण्यातील एका मंत्र्यांच्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना ५ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलिस कर्मचाऱ्यांनीच करमुसे यांना घरातून नेले होते. या प्रकरणात सुमारे ६ महिन्यांनंतर पोलिस शिपायांना अटक करण्यात आली. मात्र, अद्यापि या प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाने आज पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.
मारहाण प्रकरणात अटक केलेल्या तिघा पोलिस शिपायांच्या चौकशीत कोणत्या बाबी उघड झाल्या, करमुसे यांना घरातून आणण्यासंदर्भात संबंधित पोलिसांना कोणी आदेश दिला होता? श्री. करमुसे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाली असल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी कोणता तपास केला? त्याचबरोबर अटक केलेल्या तिघा पोलिस शिपायांविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, इंजिनिअर अनंत करमुसे यांच्यावरील मारहाणप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आव्हाडांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

 361 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.