रेल्वेप्रवासाप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

सरकारची कारवाई सूडबुद्धीने – मनसे नेते संदीप देशपांडे


कल्याण : सविनय कायदेभंग आंदोलना दरम्यान रेल्वेप्रवासा प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चारही मनसैनिकांची आज कल्याण रेल्वे कोर्टाने जामिनावर सुटका केली असून न्यायालयातून बाहेर आल्यावर संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे. कल्याण रेल्वे कोर्टात मनसे नेते संदिप देशपांडे,  संतोष धुरी, अतुल भगत आणि गजानन काळे यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपीच्या वकिलांनी न्यायलयाकडे जामीनासाठी  अर्ज सादर केला असता त्यांची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सरकार यातून करत आहे. मात्र सरकारच्या अशा कोणत्याही धाकदपटशहाला आम्ही बळी पडणार नाही, मनसैनिक त्याला अजिबात घाबरणार नाही. आम्ही जे केलं ते लोकांसाठी केलं असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तसेच सरकार डोक्यावर बंदूक ठेवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सामान्य जनतेसाठी भांडत असून सरकारला याप्रकरणी निर्णय घ्यावाच लागेल असंही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान संदीप देशपांडे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांना कल्याण रेल्वे कोर्टात आणले जाणार म्हणून कोर्ट परिसरात कल्याण आणि डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचीही मोठी कुमक तैनात करण्यात आली होती. यावेळी मनसेतर्फे ऍडवोकेट अक्षय काशीद, ऍडवोकेट कल्पेश माने, ऍडवोकेट मकरंद पंचाक्षरी आणि एडवोकेट शर्मा यांनी बाजू मांडली.

 409 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.