नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचवा

अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कडक सूचना

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच विविध आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णसेवा केंद्रबिंदू ठेवून रुग्णांशी समानुभूतीने संवाद साधा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या व महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सेवा देत असतानाच रुग्णाशी समानुभूतीने संवाद साधा.  तसेच महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेले राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हे तळागाळातील नागरिकांपर्यत पोहचतील अशा दृष्टीने काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना आज झालेल्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाणे महानगरपालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश शर्मा, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हे सर्वंच महानगरपालिकांमध्ये राबविले जात आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या आरोग्य सुविधा या जास्तीत रुग्णांपर्यत पोहचणे आवश्यक असल्याचे सांगत त्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या प्रसाविका, आशावर्कर्स यांनी नागरिकांपर्यत पोहचून राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे. तसेच किती गृहभेटी दिल्या त्याचा दैनंदिन तपशील वरिष्ठांना देणे गरजेचे आहे, तसे न झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही अतिरिकत् आयुक्त यांनी या बैठकीत दिला. जे कर्मचारी कामात दिरंगाई किंवा टाळाटाळ करीत असतील अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.
आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स, परिचारिकांनी दैनंदिन बाह्यरुग्ण तपासणी झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची गंभीरतेने दखल घेवून काम करावयाचे आहे. या कार्यक्रमासंदर्भातील दैनंदिन अहवाल वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असणार आहे. तसेच कार्यालयाच्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य असून डॉक्टर्स नसल्यामुळे रुग्णांना बराच वेळ थांबून रहावे लागल्यास व तशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या. कोविड कालावधीत महापालिकेच्या आरोगय विभागाने उत्तम काम केलेले आहे, त्याच धर्तीवर नॉनकोविड संबंधित आरोग्यसेवा देणेही तितकेच गरजेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नमूद केले.

 26,869 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.